मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

विद्या मंदिर हुंबेवाडाच्या मुलांनी घेतले तामिळी भाषेचे धडे आणि तामिळी मित्राने गिरवले मराठीची मुळाक्षरे...

विनोथ तामिळनाडूच्या रामेश्वरमजवळ परमकुडीचा. इकडे एका कार्यक्रमासाठी आला होता. आज काय करायचं तर शाळेत जाऊयात म्हटल्यावर लगेच तयार झाला. दुर्गम मराठी शाळेला भेट देण्याची ही त्याची पहिलीच वेळ. 

राधानगरी भागातील शक्य त्या पर्यटन स्थळांना तो भेटी देत आहे, आमची शाळा देखील त्याच्यासाठी एक छानसे पर्यटन ठिकाणच होते. दुचाकी डोंगरातून नीट जाणार नाही म्हटल्यावर हा पठ्या माझ्या सोबत एक दीड किलोमीटर अगदी आरामात डोंगर चढला. 

शाळेजवळ आल्यावर अगदी अवाक होऊन तो शाळा निरखून पाहू लागला. एवढ्या डोंगराळ भागात अश्या निसर्गरम्य वातावरनात भरणारी शाळा पाहून तो जाम खुश झाला.

कोरोनाच्या स्थितीतही योग्य ती काळजी घेऊन समूह अध्यापन सुरू असल्याने शाळेत उपस्थित मुलांनी त्याचे स्वागत केले. त्याला मराठी येत नसल्याने मला मुलांच्यातील आणि त्याच्यातील ट्रान्सलेटरची भूमिका बजावायची वेळ आली. तो अगदी छान इंग्रजी बोलतो त्याचा अनुवाद मराठीत करून मी मुलांना सांगत होतो. मुलांनी ओळख करून घेतल्यावर याने मुलांना "तुम्ही मला तुमच्या मराठीतील मुळाक्षरे शिकवा"असे सांगितले तशी मुलांनी देखील अगदी मनापासून योग्य तो उच्चार करत,फलक लेखन करून मुळाक्षरे विनोदला समजावून सांगितली मग विनोदने देखील तामिळी भाषेतील मुळाक्षरे मुलांना गिरवून दाखवली. 
मुलांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली. तामिळनाडू मधील प्राणी, पक्षी, घरे इथपासून ते जेवणासंबंधी अश्या सगळ्या बाबी मुलांनी समजून घेतल्या.
भाषेचा अडसर दूर सारत वेगळ्या प्रांतातील हा दोस्त मुलांच्यातीलच एक होऊन ग्राऊंडवर क्रिकेट कधी खेळू लागला समजलंच नाही. सोबतच आमच्या मुलांना देखील त्याने प्रांत, भाषा, संस्कृती जरी वेगळी तरी भारतीय आम्ही' याचा छानसा अनुभव देऊन गेला.
- हर्षल जाधव
विद्या मंदिर हुंबेवाडा
9637351400
Posted on by हर्षल जाधव | No comments

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

दिल्ली जळतेय.. जबाबदार कोण? - हर्षल जाधव


महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपला देश फिरत असताना, त्यांच्या पत्नी दिल्ली मधील आदर्शवत असणाऱ्या शाळा पाहण्याचे नियोजित असताना दिल्ली मध्ये caa आणि nrc बद्दल विरोधक आणि समर्थक यांच्यात जोरदार संघर्ष घडताना दिसत आहे. सोबतच इंडियन आर्मी च्या ड्रेसकोड मध्ये काही लोक सशस्त्र फिरताना दिसत आहेत त्याबद्दल इंडियन आर्मी च्या ट्विटर handel वरून याची माहिती दिली जाते..
विरोध करणारे आणि समर्थन करणारे दोन्ही बाजूने दगडफेक, जाळपोळ करत आहेत. 
शाहरुख नावाचा एक इसम यामध्ये खुलेआम पिस्तुल घेऊन फिरताना दिसत आहे. (यापूर्वी बंदूकधारी गोपाळ देखील पाहिला आहे) हिंसाचारात एक वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर आणि 3 सामान्य व्यक्ती दगावल्याच्या बातम्या येत आहेत. एकूण आकडा आता 7 वर गेला आहे.
मोदी, ट्रम्प साहेबांना प्रेमाचे प्रतीक असणारा ताजमहल दाखवत असताना दिल्ली मात्र द्वेषाने, रागाने, सूडाच्या भावनेने जळत आहे. हा राग, द्वेष, असूया ही दोन धर्मामधील असल्याचे चित्र पुन्हा पुन्हा इंडिरेक्टली दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

या स्थितीला सांगण्याचा भाग एवढा आहे की, 
एक शाहरुख म्हणजे देशातील संपूर्ण मुस्लिम समाज नव्हे आणि कायद्याचे समर्थन करनारे मूठभर हिंदू म्हणजे संपूर्ण देशातील हिंदू नव्हेत. अश्यावेळी महत्वाची भूमिका वठवण्याचे काम करायला हवं ते आपल्या नेत्यांनी... (दिल्लीमध्ये law and order ची जबाबदारी केंद्र सरकारची असते.. जे की गृहमंत्र्याच्या अखत्यारीत येते..) गृहमंत्री असोत किंवा पंतप्रधान.. आपला इगो बाजूला ठेऊन त्यांनी या कायद्याला विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधायला हवा.. यासाठी स्वतःहुन त्यांनी पुढे यायला हवं.. फक्त गांधी प्रतिमेपुढे हात जोडून आणि चरखा कसा चालवावा याबद्दल साबरमती मध्ये जाऊन मार्गदर्शन केल्याने गांधी होता येत नाही. देश स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद साजरा करत होता तेंव्हा गांधी बा नोआखोली सारख्या ठिकाणी हिंदू - मुस्लिम दंगली थोपविण्यासाठी स्वतः गेला होता हे गांधींना जगभर मांडत फिरणाऱ्याना समजायला हवं..
शेवटी
दिल्ली दिल्लीच रहावी. गुजरात पॅटर्न लागू करून गोद्रा व्हायला नको कारण 
राहत इंदौरी म्हणतात तस - 'आग का क्या है पल दो पल में लगती है, 
बुझाते बुझाते एक ज़माना लगता है'

हर्षल जाधव, 9637351400
25/02/2020
Posted on by हर्षल जाधव | No comments

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

प्रजासत्ताक दिन आणि अंधश्रद्धा ने झालेले दीन

34 वर्षे अविरत चालू असलेल्या साप्ताहिक बार्शी शिवप्रभात मध्ये मी प्रजासत्ताक दिनादिवशी लिहिलेला लेख 'प्रासंगिक' या सदराखाली प्रकाशित झाला आहे...

Posted on by हर्षल जाधव | No comments

रविवार, २६ जानेवारी, २०२०

आजचा प्रजासत्ताक दिन अन उतारा...- हर्षल जाधव सर

प्रजासत्ताक दिन आणि अंधश्रध्देमुळे झालेले दीन...

२६ जानेवारी १९५० ला या देशाला स्वतः ची अशी घटना मिळाली. जी घटना देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या हक्काचे सुंदर आयुष्य जगायला मदत करेल. राज्यघटना आपल्याला भारतीय नागरिक म्हणून आपले आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते. या मुलभूत हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता, उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने कोठेही उपस्थित राहण्याचे व सभा स्वातंत्र्य, आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी habeas corpus यासारख्या याचिकांचा अधिकार देखील हक्क म्हणून दिला आहे. 
या अधिकारांचा भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंडविधान संहितेखाली शिक्षा होऊ शकते.
जसे हक्क महत्वाचे आहेत तसे कर्तव्य देखील महत्वाची आहेतच ना..
 जसे भारतीय नागरिकांना हक्क दिले आहेत तशी काही कर्तव्य देखील दिली आहेत त्यातीलच एक म्हणजे, ‘इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायिन्टिफिक टेम्परामेंट्स, स्पिरिट ऑफ इनक्वायरी अॅन्ड ह्युमनिझम’. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन, शोधक बुध्दी, मानवतावाद याचा विचारप्रसार आणि अंगिकार करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं घटनादत्त कर्तव्य आहे
 हे कर्तव्य ठळक करण्याचे कारण म्हणजे आजच देशाचा ७१ वा प्रजासत्ताक दिन शाळेत साजरा करून येत असताना एका ओढ्याच्या बाजूला हा उतारा ठेवला होता..उतारा ज्या परडीत ठेवला होता ती इतकी आकर्षक होती की तिला पाहताच  आम्ही गाडी थांबवली. मी आणि विनोद ने परडी मध्ये  कोणकोणत्या गोष्टी आहेत ह्या पहिल्यादा पहिल्या. त्यात ६-७ लिंबू, काळे कापड, खाऊची पाने, काजळ डबी, कापून ठेवलेला कांदा अस बरच साहित्य होत. हे सगळं साहित्य कालांतराने वायाच जाणार होते म्हणून त्यातील आम्हाला उपयुक्त असणारे साहित्य आम्ही घेतले आणि आमचा पुढील प्रवास पुन्हा सुरू झाला. 

हे सगळं एवढ्यासाठी लिहितोय कारण राज्यघटना अंमलात येऊन तब्बल ७१ वर्षे उलटून देखील ही उतारा ठेवण्याची आमची अंधश्रद्धा काही कमी झालेली नाही. प्रत्येक गावच्या तिकटी वर आणि ओढा, नदी, विहीर, जुना पडका वाडा ह्या ठिकाणी भूत, पिशाच्च, चेटकीण यांच्या भीतीने हा उतारा ठेवलाच जातो. 

एका बाजूला पोटाला महत्वाचे अन्न घटक न मिळाल्याने कुपोषणाने बालक मरणाऱ्या देशात असल्या अंधश्रध्देला बळी पडून स्वतःच्या हातानेच स्वतः चे व कुटूंबाचे आर्थिक, मानसिक शोषण करून आणि त्याच हाताने देशाच्या राष्ट्रध्वजाला वंदना देखील केल जाते हा केवढा मोठा विरोधाभास आहे. 

देशाचे जबाबदार नागरिक म्हणून संविधानातील या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे हे कर्तव्य आपण बजावायलाच हवं. जेंव्हा ही सर्व कर्तव्य आपण शक्य तेवढी नीट पार पाडू तेंव्हाच आपल्याला या देशाचा सुजाण नागरिक म्हणवून घेण्याला अर्थ आहे. 

संविधान आणि त्यांच्यातील हक्क आणि कर्तव्य ही आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग होणे हेच या प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे खरे प्रयोजन असायला हवं..

निदान या प्रजासत्ताक दिनापासून तरी असे उतारे कोणी ठेऊच नयेत याबद्दल समाजात जाऊन प्रबोधन करणे आणि असे उतारे दिसलेच तर न घाबरता, मनात कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता त्यातील उपयुक्त साहित्य सर्वांसमक्ष उचलून लोकांच्या मनातील भीती काढून टाकूयात..
भीतीमुक्त, अंधश्रद्धा मुक्त समाज घडवण्यासाठी उभे राहुयात हीच या प्रजासत्ताक दिनी ध्वजाला केलेली कृतीयुक्त मानवंदना असेल...

विवेकाचा आवाज बुलंद करूयात...
- हर्षल जाधव सर, कसबा तारळे 
9637351400

सोमवार, ३ जून, २०१९

रविश कुमारांचं 'द फ्री व्हॉइस'


लोकशाहीच्या चौथा खांब ज्यावेळी प्रस्थापितांची ओझी उचलण्यात धन्यता मानतो किंवा त्यातच आपले सौख्य सामावले आहे अशी परिस्थिती त्यांच्यासाठी निर्माण केली जाते तेंव्हा काही मोजकीच धैर्यवान लोक पत्रकारितेचा आत्मा जिवंत ठेवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अव्याहतपणे सत्य मांडत राहतात अश्या मोजक्या पत्रकारांपैकी एक असणारे रविश कुमार..
रविश कुमारांचं 'द फ्री व्हॉइस' हे पुस्तक आजच वाचून पूर्ण केले.

रविश कुमारांनी सत्य मांडत असताना झुंडीकडून, समूहाकडून, असत्यशी असणारे हितसंबंध जोपासणाऱ्या लोकांकडून येणाऱ्या धमक्या, फेक न्यूज, ट्रोलिंग यांचे विस्तृत विवेचन या पुस्तकात मांडले आहे.

पुस्तकात त्यांनी 'बोलते व्हा', 'यांत्रिक लोक आणि नव्या लोकशाहीची इमारत', 'भयपेरणीचा राष्ट्रीय प्रकल्प', 'जिथे झुंड असते, तिथे हिटलरचा जर्मनी असतो', 'आपण जनता आहोत', 'बाबालोकांचा देश', 'प्रेमाची गोष्ट', 'खाजगीपणाचा मूलभूत हक्क' आणि 'चला, स्वातंत्र्यदिनानिमित्त आईस्क्रीम खाऊ' या लेखांचा समावेश आहे.

अनेक विषयांचा परामर्श घेतानाच लोकांचा सोशल मीडिया किंवा मुख्य प्रवाहातील मीडियातून बोलण्याचा अवकाश किती आहे आणि तो अवकाश दिवसेंदिवस कसा कोंडला जातो आहे यावरची निरीक्षणे ते मांडतात.

'प्रेमाची गोष्ट' या लेखाचा मला येथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या लेखात रवीश कुमार म्हणतात, 'भारतात प्रेम करणं एक लढाई आहे.' त्यांचे हे शब्द सत्याची प्रचिती देऊन जातात. या लेखात रवीश कुमारांनी चित्रपटातली प्रेमाची व्याख्या सांगितली आहे. गरीब-श्रीमंत दरी, जातीच्या भिंती अनेक चित्रपटांतून दाखवण्यात येतात. त्यामुळे प्रेम करताना जातीच्या रिंगणातच प्रेमाच्या शक्यता शोधाव्यात असं उपहासानं रवीश कुमार म्हणतात.

बहुतांश चित्रपट व्यवस्थेला धक्का न बसू देता तयार केले जातात. यात इतकं पराकोटीचं काल्पनिक विश्व उभं केलेलं असतं की, नायक-नायिका सुंदर असतात, छान छान गाणी गातात. ही गाणी गुलजार किंवा आनंद बक्षी यांच्यासारख्या ख्यातनाम गीतकारांकडून लिहून घेतली जातात आणि कडू-गोड प्रसंगानंतर पळून जाण्याचा संदेश यातून दिला जातो.
प्रत्यक्षातही ज्यांनी आंतरजातीय विवाह केले आहेत, विशेषतः राजकारणातल्या व्यक्ती असतील तर सार्वजनिकरीत्या ते आपलं प्रेम व्यक्त करत नाहीत. मतदार नाराज होतील अशी भीती त्यांना वाटत असते. खूप क्वचित वेळा काही लोक हे जाहीरपणे बोलण्याचं धाडस करतात आणि त्याची किंमतही मोजतात. रवीश कुमार म्हणतात, आपल्याकडे प्रेम करण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत, याबाबत ते आपली भूमिका ठामपणे मांडत असंही लिहितात की, "मी जर नेता असतो तर प्रत्येक शहरात एक प्रेम उद्यान बांधल असतं आणि आनंदाने पुढची निवडणूक हरलो असतो कारण समाजाने त्याला मान्यता दिली नसती."

हुंड्याच्या अर्थशास्त्रावरही रवीश कुमार प्रकाशझोत टाकतात. प्रेम असलं तरी हुंडा देणं-घेणं यात त्या तरुणालाही वावगं वाटत नाही, याबद्दलची खंत व्यक्त करून रवीश कुमार अशा तरुणांना 'चुल्लूभर पाणी में डूब मरो' असं वैतागून म्हणतात.

प्रेम माणसाला जबाबदार बनवतं. प्रेमानं त्यांना जग बदलायचं असतं. ऋतूंचा ताल प्रेमिकांच्या हृदयात असतो, अशी हळुवारपणे प्रेमाची ताकद सांगत असतानाच प्रेमाचं दुबळेपणही रवीश कुमार सांगतात. प्रेम करणं म्हणजे केवळ 'आय लव्ह यू' म्हणणं नसून दुसर्‍याबरोबरच स्वतःलाही ओळखणं असतं.

ऑनर किलिंगची उदाहरणं देताना रवीश कुमार प्रेम, हिंसा, धर्म, याबरोबरच मुलगी नको म्हणून पोटातच मारून टाकणार्‍या पालकांच्या मानसिकतेवरही प्रहार करतात.
प्रेमाला मोकळं अवकाश मिळायला हवं. त्या मोकळ्या अवकाशात प्रेम बहरायला हवं आणि प्रेमातून माघार घेणार्‍या प्रेमिकांनी डरपोक व्हायचं की, स्वतः निर्णय घेऊन आपलं प्रेम यशस्वी करायचं हे ठरवायला हवं.
रवीश कुमारांना ऐकणं हा जेवढा आनंददायी अनुभव आहे, त्याचबरोबर त्यांचं लिखाण वाचणं हाही अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा अनुभव आहे.
पुस्तकाचा मराठी अनुवाद सुनील तांबे यांनी केला आहे तर प्रस्थावना फेसबुक मित्र  यादीतील @मुग्धा कर्णिक यांनी केला आहे.

हे पुस्तक कधी तिरकस, कधी सडेतोड आणि सातत्याने सखोल गंभीरी शैलीत, देशाच्या सद्य परिस्थितीवर वृत्तांकना सारखीच टिपण्णी करते. हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि त्यावर विचार करावा असे आहे.

- हर्षल जाधव , कोल्हापूर 9637351400

बुधवार, १५ मे, २०१९

'जात बघून प्रेम करा' असा शासनाने जी.आर काढावा..


'जात बघून प्रेम करा' असा शासनाने जी.आर काढावा..
पालकांनी लहानपणापासून मुलांना माणसांवर प्रेम करा म्हणायचे तुणतुणे वाजवणे बंद करावे..
आपली जात, धर्म, वंश किती महत्वाचा असतो याची पट्टी लहानपणापासून वदवून घ्या... अभ्यासक्रमात एखादा धडाच घुसवला तरी चालेल...
आपल रक्त आणि त्या दुसऱ्या खालच्या जातीतील व्यक्तीचे रक्त कसे वेगळ आहे हे पटवून सांगण्यासाठी त्या रक्तात निळा, हिरवा, भगवा थोडा थोडा रंग मिक्स करा... नाहीच रंग बदलला तर रुढी, परंपरा, घराणे नावाचा अत्तर शिंपडा त्यावर ...घरात याची काही सेंपल ठेवून घ्या..
प्रेमातून नव्हे तर फक्त आणि फक्त वासनेतून मुलांना जन्म द्या..तेंव्हाच आपल्या या प्राणांपेक्षाहि अधिक किंमतीची असलेली जात, धर्म आपल्याला टिकवता येईल...
पोटच्या पोरांना रक्ताच्या थारोळ्यात बघून आसुरी आनंद कसा घ्यायचा याचा crash कोर्स सुरू करा...
पेटवून, गळा दाबून, सुपारी देऊन यात अजून काही मार्ग add होतात का ते गूगल करा...
प्रेमातून (अनेकांच्या भाषेत लफड) लग्न केले म्हणून पोरीला संपवून 56 इंच छाती घेऊन स्वतःहून पोलीस चौकीत हजर व्हायची हिम्मत आणायला जुनी उदाहरणे वाचत जा..यामुळे प्रेरणा मिळेल मेलेल्या मनाला...
पण
हे सगळं करूनहि,
रुक्मिणी-मंगेश, प्रणय-अमृता, इंद्रजित-मेघा
पुन्हा पुन्हा जन्माला येतील
आपल्या प्राणांची आहुती देऊन
जाती धर्माला मूठमाती देतील...
- हर्षल जाधव,
9637351400
Posted on by हर्षल जाधव | No comments

बुधवार, ३१ जानेवारी, २०१८

अमृता इमरोझ एक प्रेमकहाणी...प्रेम अध्यायाचे पारायण - हर्षल जाधव




             एखादं पुस्तक मनापासून आवडाव आणि त्यांची पारायणावर पारायण घडावी असं क्वचितच घडतं. हे पुस्तक मी पहिल्यांदा 12 वी सायन्स मध्ये असताना वाचलं... पुन्हा डी.एड  ला असताना ते परत हातात आलं नंतर असच एका मित्राच्या घरी गेलो असता तेथे मला ते पुन्हा भेटल आणि परवा रत्नागिरी नगर वाचनालयात गेलो असता त्याची आणि माझी पुन्हा नजरा नजर झाली आणि परत एक पारायण घडलं...
          प्रेम कथा म्हटलं की आपल्याला हीर रांजा लैला मजनू अश्या एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या आणि प्रेमासाठी स्वतः च्या जीवाची देखील परवा न करणाऱ्या जोड्या आठवतात पण एकाच आयुष्यात दोघांजनांवर तेवढ्याच ताकदीने प्रेम करनारी रिअल लाइफ मधील नायिका भेटते ती याच पुस्तकातून..
अमृता-इमरोझ अ लव्ह स्टोरी या उमा त्रिलोक यांच्या इंग्लिश पुस्तकाचं भाषांतर अनुराधा पुनर्वसू यांनी केलं "अमृता-इमरोझ एक प्रेम कहाणी" या नावानं.. या पुस्तकात आपल्याला फक्त अमृता-प्रीतम किंवा इमरोझ भेटत नाहीत.. तर सापडतो एक सच्चेपणा आणि दुर्मिळ अशी प्रेमभावना..जी शारिरीक  प्रेमाच्याही पलीकडे जाते..
        'अमृताजी' वाचकांचे आस्मान उंचावणारी हि लेखिका.. साहित्य जगतातला सर्वोच्य मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पदमश्री  आणि पदमविभूषण हे दोन्ही किताब त्यांना मिळाले आहेत. सहा विद्यापीठानी डी .लिट पदवी  देऊन त्यांचा सन्मान केला आहे.. सहस्त्रकाची कवयत्री म्हणूनही  त्यांना मानलं जातं .. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचा साखरपुडा झाला , अकराव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले, सोळाव्या वर्षी पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले अन् सोळाव्या वर्षीच प्रीतमसिंहांशी विवाह झाला. पुढे साहीरवर त्यांचे उत्कट प्रेम जडले जे अखेरच्या श्वासापर्यंत टिकून होते.  साहिर मुंबईत हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावायला आले आणि मग इथलेच झाले. चित्रपट गीतकार आणि शायर म्हणून त्यांनी अमाप ख्याती मिळवली. साहीर मुंबईला गेले आणि त्या मायानगरीचाच झाले, या वास्तवानं अमृता एकीकडे आतून उन्मळून पडल्या. उद्ध्वस्त झाल्या. तर दुसरीकडे साहीर यशाच्या पायऱ्या चढत गेले याचाही अमृतांना आनंद झाला. पुढे साहीरसाठी अमृतांनी लिहिलेल्या ‘आखरी खत’चं कव्हर तयार करण्यासाठी म्हणून चित्रकार इमरोजशी त्यांची पहिली भेट १९५८ मध्ये झाली. आणि हि भेट पुढील आयुष्य एकत्रच राहण्यात झाली. ते पुढे एकमेकांबरोबर पन्नास वर्षे एकत्र राहिले. तेही कुठल्याच कायदेशीर नात्याचा अट्टहास न करता. फक्त प्रेमाच्या नात्यावर त्यांचा संसार झाला. 60-65 वर्षांपूर्वीची ही गोष्ट म्हणजे एक क्रांतीच होती...या क्रांतीचीच उत्तर कथा लेखिकेने या पुस्तकात मांडली आहे.
         अमृता-इमरोझच्या आयुष्यातले एकेक किस्से लेखिका सदरच्या पुस्तकात गुंफत जाते. अधेमधे त्यावर भाष्यही करते. ओघवत्या भाषाशैलीमुळे वाचकाच्या समोर ते प्रसंगच उभे राहतात. दोन मुलांची आई आणि विवाहित असलेल्या असलेल्या अमृताजींचा इमरोझबरोबर राहण्याचा निर्णय म्हणजे खूप मोठं बंडच होतं. त्यावर लेखिका म्हणते, 'बदल पाहिजे बदल पाहिजे अशा गप्पा आपण मारतो. पण प्रत्यक्षात बदल घडून येतो, तेव्हा मात्र घाबरतो. अमृता-इमरोझनं स्त्री-पुरुष संबंधाबद्दलची नवी वेगळी भाषा दिली आहे.'.. 
आणखी एका ठिकाणी आपलं प्रेम विषयीचं मत व्यक्त करताना त्या म्हणतात " प्रेमाच्या दोन जाती आहेत . एक प्रेम आभाळासारख असतं तर दुसरं डोक्यवरच्या छपरासारख असतं. साहिर लुधियानवी त्यांच्यासाठी आभाळासारखे होते. बाईला दोन्ही हवं असतं . प्रसंगी छप्परच आभाळ होतं." लेखिका जसे स्वतःची मते मांडत जाते तशीच अमृता- इमरोज यांच्या दिलखेचक संवाद देखील शब्दबद्ध करत जाते..
अमृताजी जगण्या मरण्याची भाषा करत असताना इमरोझ यांना म्हणतात "तुझ्याशिवाय जगणं म्हणजे मरणच मला एवढ्यात मरायचं नाही ." तू एकदा बाहेर जाऊन जग बघून घे . परत आल्यावर सुद्धा तुला माझ्याबरोबरच राहावंसं वाटल तर तू सांगशील ते ऐकायला मी तयार आहे." इमरोज नि त्यांच्या  छोट्याश्या खोलीत तीन फेऱ्या मारल्या आणि म्हणाले, "बघ झाल माझं जग पाहून !" असं हे विलक्षण नातं वाचताना मन हरपून जात.. अमृताजींना जेंव्हा त्यांच्या व इमरोजच्या नात्याविषयी विचारलं जातं तेंव्हा त्या ठामपणे म्हणतात , " ज्या जोडप्याना परस्परांच्या प्रेमाची खात्री नसते , त्यांनाच समाजाच्या मान्यतेची गरज भासते. आम्ही आमची मन पूर्णपणे जाणतो आहोत ; मग समाजाची लुडबुड  हवीच कशाला... "
अजून एक असाच  किस्सा असा आहे की दोघं मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येत होते. ट्रेनमध्ये सामानात काही दारू वा मादक पदार्थ आहेत का हे तपासायला पोलीस आले. अमृता प्रीतम म्हणतात - 'आमच्यापाशी तसं काही नाही, याची खात्री करून घेऊन त्यांनी आम्हाला सोडून दिलं. पण एकमेकांबरोबर असण्याची नशा आम्हाला पुरेशी आहे, हे त्यांना माहीत नव्हतं. आमची नशा ते थोडीच उतरवू शकणार होते.' एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेपणाची जाणीव त्यांच्या या संवादातून वाचकाला होत जाते. हि सगळी वाक्ये आणि त्याचे आयुष्य हे जरी एक परिकथा वाटल असले, तरी याला वास्तवाची झालर आहे. म्हणूनच अमृताजींचं साहिर सुधियानींवर असलेल्या प्रेमाचाही उल्लेख येतोच आणि त्याचा स्वीकार इमरोझनी केलाच होता. अमृताजी इमरोझपेक्षा वयानं मोठ्या. त्यांच्या आजारपणात इमरोझनी त्यांची खूप सेवा केली. इमरोझ हे मोठे चित्रकार होते.. पण अमृताजींपुढे ते तसे झाकोळलेले राहिले. त्यावर ते स्वत: म्हणतात, 'लोक म्हणतात की तुमचं आयुष्य तुम्ही केवळ अमृताला वारा घालण्यातच व्यतीत केलं. पण त्यांना हे माहीत नाही की तिला वारा घालता घालता मलाही हवा लागत होती.'
        या पुस्तकाच्या लेखिका उमा त्रिलोक यांनी अमृता आणि इमरोज यांच्या नात्याचे इतके पैलू मांडलेत जे वाचताना थक्क व्हायला होतं.. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अमृता किंवा इमरोझला महान बनवलं नाही. की स्वत:चा उदोउदोही केला नाही. ही माणसांची गोष्ट आहे. त्यांच्या गुणदोषांसकट.. पण ही माणसंच अनोखी आहेत.एके ठिकाणी इमरोझ म्हणतात, अमृताची भेट झाल्यापासून माझ्यातली रागाची भावना लुप्त झाली. प्रेमाची भावना प्रबळ झाल्यामुळे द्वेष, राग, मत्सर यांना थाराच नसावा. प्रकाश असेल तिथे अंधार असेल का?

         आपल्या आजूबाजूला मनाच्या आणि रक्ताच्या नात्यांतली असुया, कडवटपणा आपण पाहत असतो. अनुभवत असतो. अनेक जण मी, माझं, मला या वर्तुळात फिरत असतात. या सर्व परिस्थितीत हे पुस्तक हाती पडतं आणि ते वाचल्यावर आनंदाची लहर आपल्या मनात बराच काळ तरंगत राहते..अमृताजींचे  हिमतबाज, बहुरंगी व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच वाचायला हव. जीवनाचा खरा अर्थ अन् प्रेमातलं जगणं शोधायचं असेल तर अमृता-इमरोजच्या प्रेम अध्यायाचे हे पारायण पुन्हा पुन्हा व्हायलाच हवे...