बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

आमची दिवाळी...

कुर ता. भुदरगड येथील पुरोगामी वाचन चळवळ आणि आम्ही कूरकर आयोजित विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिर..२०१७ च्या पहिल्या दिवशी मी राजवैभव आणि आमची लहान कार्यकर्ती सोनम जाधव ने शिबिरार्थींशी
अंधश्रध्दा निर्मुलन या विषयाच्या अनुशंघाने संवाद साधला..
मुलांचा उत्साह उदंड होता.. नेहमी प्रमाणे छान प्रतिसाद मिळाला...

गोविंद पाटील सर आणि टीमने शिबिराचे नियोजन उत्तम केले आहे.. तुमच्या या कार्यास सदिच्या...

Posted on by हर्षल जाधव | No comments

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

आम्हाला संकटातून बाहेर काढणारा रियल सिंघम...

निवडणुक ड्यूटी म्हटलं कि अनेकांच्या मनात धस्स होत..
निवडणुक साहित्य हातात भेटल्यापासून ते संपूर्ण निवडणुक प्रक्रिया पूर्ण करून ते साहित्य परत जमा करण्याचा काळ हा एखाद्या मोहिमेपेक्षा कमी नसतो..

तर हा किस्सा सगळी निवडणुक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडून साहित्य जमा करायच्या ठिकाणी जात असतानाचा आहे..

बरोबर 6:00 वाजता आम्ही आमचे निवडणुक साहित्य घेऊन एस.टी मध्ये बसलो. सूर्यमामा आपली दिवसाची कामगिरी बजावुण संध्याछायेच्या कुशीत शिरला होता. चंद्र आपलं अस्तित्व सिध्द करण्यासाठी ढगांशी द्वंद्व करत होता... अंधार आपलं साम्राज्य हळूहळू स्थापन करत होता..एस.टी च्या ड्रायव्हर काकांनी एस.टीच्या लाईट कधीच सुरू केल्या होत्या..

वेगवेगळ्या गावातील अजून 11 निवडणुक केंद्रावरील टिम्स् ला घेऊन आम्हाला पुढे साहित्य जमा करायला जायचे होते....आता पर्यत 4 टीम एस.टी मध्ये आल्या होत्या. छोटी- छोटी गावं..लहान- लहान वस्त्या आणि या गावांना जाणारा चिंचोळा रस्ता... एका वेळी एकच वाहन जाईल असा मर्यादित व्यवस्था.. समोरून अचानक दुसरं वाहन आलं तर एकमेकांना वाट खुली करून देण्यासाठी एका वाहनाला रस्ता सोडून बाजूला वाहन घेऊन जायची वेळ यायची. भरीत भर म्हणजे आमच्या एस.टीला मागील बाजूचे लाईट देखील नव्हता. रस्त्याच्या बाजूला गवत पाऊसाच्या पाण्याने जोमान वाढलं होतं. त्यामुळे रस्ताच्या कड़ा रात्रीच्या अंधारात स्पष्ट दिसत नव्हत्या...
काही गावांकडे जायचे रस्ते हे हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत होते तर काही ठिकाणी यंदाच्या जोरदार पाऊसाने आख्खा रस्ताच धुऊन नेला होता..एवढी बेदरकार आवस्था अश्या रस्त्याने आमचा परतीचा प्रवास सुरू होता..कधी एकदा हे साहित्य जमा करतो आणि या निवडणुक ड्यूटीच्या अग्निदिव्यातून बाहेर पडतोय अशीच प्रत्येकाची भावना होती. दिवसभर मतदान प्रक्रिया डोळ्यात तेल घालून अगदी व्यवस्थित पार पाडून प्रत्येकालाच जाम कंटाळा आला होता..

अश्यातच एका गावाची वेस ओलांडून पुढील गावातील केंद्रावर जात असताना एका वळणावर आमच्या एस टी चे ड्रायव्हर काका टर्न घेत असताना अंधारात रस्त्याचा अंदाज चुकला आणि आमची एस.टी अगदी हळुवारपणे बाजूला असलेल्या खोलगट भागात उतरली..एवढी उतरली कि तिची एक बाजू पूर्णपणे जमिनीला समांतर टेकली.... दिवाळीच्या कल्पनाविलासात रमलेल्या आम्हा सर्व कर्मचा-र्यांना हा अचानक घडलेला प्रकार प्रथम लक्षातच आला नाही. काही कर्मचा-र्यांनी खाली उतरून पाहिलं तेंव्हा त्यांना धक्काच बसला..महाभारतील कर्णाचं चाक जसं रणांगणावर रूतून बसलं होतं अगदी तशीच काहीशी आवस्था आमच्या एस.टीच्या चाकाची झाली होती.. एका भल्या मोठ्या खड्यात गाडीच्या मागील चाकाने आपलं बस्तान बसवल होतं.. खड़्डा भलताच मोठा होता त्यातून गाडी परत वर येईल असं प्रथम दर्शनी पाहणाऱ्याला आजिबात वाटत नव्हतं...नेमकं काय झालय हे पहायला प्रत्येक जण तिथे जायचा आणि स्वत च्या अकलेचे तारे तोडून मोकळा व्हायचा. शिक्षकांची संख्या मोठी असल्याने कल्पना मांडायची काहीच कमतरता नव्हती. कोणी म्हणे आपण क्रेन बोलाऊन बस बाहेत काढू. कोणी म्हणे दूसरी एस.टी मागवू तर काही लोक तर आता काहीच होणार नाही अस म्हणत डोक्याला हात लावून बसले होते. अती दुर्गम भागात असल्याने मोबाईलला रेंज कधी शिवत होती तर कधी गायबची व्हायची..त्यामुळे फोन करून मदत भेटेल याची शक्यता देखील कमी होती.

त्याच वेळी निवडणुक पेट्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्या पोलीस टीम मधील एक हवालदार बाहेर आले.. आपल्या मोबाईलच्या टोर्च ने नेमकं काय झालय याची त्यांनी पाहणी केली. मनात काहीसा ठाम विचार करून अंगावर घातलेले काळे जाकेट त्यांनी  बाजूला केले आणि एस.टी च्या बाजूला वाढलेले गवत पहिला स्वत हून एकट्याने बाजूला केले. आता एस टी ची फसलेली बाजू स्पष्ट दिसू लागली होती.. चाकाकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आणि आपल्या ईतर साथीदारांना नेमक काय करता येईल याविषयी चर्चा करून दगड गोळा करायला सुरवात केली. शक्य होईल तिथे जाऊन दगड जमवले. अंधार असल्याने दगड भेटणे देखील दुरापास्त झाले होते. जमिनीत रुतलेले बरेच खोलवर गेलेले दगड त्यांनी बाहेर काढून बसच्या चाकापुढे टाकायला सुरवात केली. खड़्डा भरायचं काही नावं घेत नव्हता. हा गडी देखील मागे हटायला तयार नव्हता. खड़्डा आपण दणकट दगडाने भरला तर चाक नक्कीच बाहेर येईल असा त्याचा आशावाद होता पण त्याचं हे काम मोठ्या दिमाखात हातावर हात ठेऊन पाहणा-र्यांनी त्यांना वेड्यात काढण्याचा शक्य तेवढा सगळा प्रयत्न केला. "सोडा ओ कशाला उगाच हात झाडत बसलाय..!!"
"हे शक्य नाही.. अहो चाक किती खाली गेलय बघा ते फिरेल का व्यवस्थित..!!"
"चाक बाहेर येऊन उपयोग काय पुढे एस.टी जायला जागा नको का..!!" अश्या अनेक गप्पा आजुबाजूला सुरू होत्या पण हा माणूस आपल्या प्रयत्नांवर ठाम होता...मनातील कल्पना जर बरोबर ठरली आणि ड्रायव्हर काकांनी गाडी बरोबर हन्डेल केली तर चाक बाहेर निघेल असं त्यांना मनोमन वाटतं होत म्हणूनच त्यांचा हा एकांगी प्रयत्न सुरू होता..अगदी ड्रायव्हर काका देखील त्यांना "हे शक्य होईल असं वाटत नाही" असं सांगून गेले होते.
शेवटी शक्य तेवढे आजुबाजूचे सगळे दगडे त्यांनी बाजूला लाऊन घेतले आणि ड्रायव्हर काकांना एस.टी स्टार्ट करून प्रयत्न करायला लावला आणि काय आश्चर्य त्यांनी त्यांच्या कल्पनेने योग्य ठिकाणी लावलेले दगड कामी आले आणि बस अगदी आरामात पुन्हा रस्त्यावर आली आणि एकच जल्लोश झाला...
सगळ्यांचा जीव भांड्यात पडला...चेहऱ्यावरील चिंतेच्या रेषा गायब होऊन एक स्मित हास्य प्रत्येकाच्या ओठांवर दिसू लागलं...

फुकटचे सल्ले देणारी तोड़ं आता त्या पोलीसाचे कौतुक करण्यात व्यस्त होते..एकाही दगडाला हात न लागलेले हात त्या हवालदारांचे अभिनंदन करायला पुढे येत होते.. लोक पटापट एस.टीत चढ़ले..पुन्हा बस मध्ये देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.. पुढे नव्याने एस.टी त येणाऱ्या टीम्सला हा सम्पूर्ण प्रकार सांगितला कि ते देखील त्यांचं कौतुक करायचे...

फोटोत दिसणारी ती तीच व्यक्ति आहे *श्री. संदीप भगवान काशीद..*ज्यांनी आम्हाला अगदी सुखरूप त्या संकटातून बाहेर काढून रात्री अगदी अपेक्षित वेळेवर म्हणजे रात्री 9:00 वाजता नियोजित ठिकाणी निवडणुक साहित्य जमा करायला पोहचवले...
अभिनंदन स्वीकारताना ते आवर्जून म्हणाले कि "आपण शक्य होईल तेवढे सगळे प्रयत्न करायचे..मागे हटायचं नाही.."आपल्या क्रुतीतून त्यांनी हेच दाखवून दिलं होतं...

प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या आजुबाजूला उपलब्ध असलेल्या साधनांचा कल्पकतेने वापर करून आपल्याला समस्या सोडविता आली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनात यापेक्षा वेगळं असं काय असतं..

पडद्यावरील कॅमेरा अड्जस्ट करून स्टन्ट करणारा सिंघम होण्यापेक्षा रियल लाईफ मधील आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडणारा संदीप काशीद सारखा पोलीस मला लाख मोलाचा वाटतो...

संदीप भाऊ आम्हाला तुमचा अभिमान वाटतो..
थँक्स महाराष्ट्र पोलीस...
तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत..

- हर्षल जाधव
9637351400

Posted on by हर्षल जाधव | 1 comment

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

ग्रेट_भेट विथ ज्येष्ठ तमाशा कलावंत लावणी साम्राज्ञी सौ. मंगला बनसोडे




समताचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नियोजित स्थळी जात असताना अचानक एका प्रसिद्ध व्यक्तीमत्वा सोबत फोटो क्लिक करायची संधी भेटली.. कोण हि व्यक्ती तर ज्यांच्या शिवडीतील बांगो गाण्यामुळे 22 हजार रसिक शांत झाले होते, लावणीमध्ये चित्रपटातील कॉश्च्यूम ज्यांनी प्रथम आणले, नाचता नाचताच ज्यांना प्रसवकळा येऊ लागल्या. मंचावरच काही गावकरी महिलांच्या साथीने त्यांची डिलीव्हरी देखील झाली. विशेष म्हणजे प्रसुतीनंतर अवघ्या काही वेळातच ज्या पुन्हा मंचावर आल्या आणि ज्यांनी  नृत्याविष्कार पुन्हा सादर केला..वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी पायात  घुंगरू आलं ते आजतागायत त्याचा छनछनाट सुरूच आहे. सुख दु:खाच्या हिंदोळ्यावर लहरत समाजमनाला आनंद देण्याचे काम करत ही कला जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी स्वतःच उभं आयुष्य वेचलं अश्या ज्येष्ठ तमाशा कलावंत लावणी साम्राज्ञी मंगला बनसोडे यांची हि ग्रेट भेट...

मनात कोठेही आपण फार मोठी सेलिब्रेटी असल्याचा किंचितही भाव नसलेल्या, प्रचंड मनमेळावू असं हे व्यक्तीमत्व..आम्हा सगळ्याची त्यांनी अगदी आपुलकीने ओळख करून घेतली. समता चा वाढदिवस असल्याचे कळताच त्यांनी तिला भरभरून सदिछया दिल्या...

अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांना भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार देखील जाहीर झाला आहे त्याबद्दल आम्ही सगळ्यांनी त्यांना सदिछया दिल्या... यापूर्वी त्यांची आई विठा भाऊमांग नारायणगावकर आणि वडील भाऊमांग नारायणगावकर यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला होता. एकाच कुटुंबातील तिघांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे बनसोडे कुटुंबाने राष्ट्रपती पुरस्कारांमध्ये हॅट्ट्रीक मिळवली आहे.

बोलण्याच्या ओघात त्यांनी, "हा पुरस्कार म्हणजे सातारकरांच्यासाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे" असे सांगितले पण आमच्या अजय ढाणेने "हि तर नुसत्या सातारकारांचीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या अभिमानाची बाब आहे" असं सांगून त्यांना सदिछया दिल्या. अखेर त्याचा निरोप घेऊन आम्ही आमच्या पुढील प्रवासाला निघालो..

दिनांक १०/१०/२०१७
- हर्षल जाधव
9637351400

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

एस.टी बस मध्ये वाढदिवसाची मला मिळाली भन्नाट भेट..

काल माझ्या वाढदिवसानिमित्य आपण शुभेच्छांचा जो पाऊस पाडलात त्यात मी पूर्णपणे न्हाऊन गेलो आहे. प्रत्यक्ष call करून, फेसबुक,
whats app वरून आणि शक्य त्या सर्व माध्यमातून मला तुम्ही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपला ऋणी आहे...

काल मला एस.टी बस मध्ये वाढदिवसाची एक भन्नाट भेट मिळाली.
काल मी रत्नागिरी ते कोल्हापूर एस.टी बसने प्रवास करत होतो. प्रवाश्यांनी गाडी बरीच भरली होती. एस.टी चे निरीक्षण केल्यावर मला जाणवलं की आत मध्ये प्रत्येक खिडकीला एकसारखं दिसणारे एक स्टिकर लावलं आहे.

काय होतं हे स्टिकर तर भूत, भानामती, करणी, love प्रॉब्लेम, नोकरीत समस्या यांवर हमखास उपाय सुचवणार्या भोंदुबाबांच्या धंद्याची जाहिरात... गेल्या अनेक महिन्यापासून मी जेंव्हा जेंव्हा एस.टी ने प्रवास करतो तेंव्हा शक्य होईल तेवढी ही स्टिकर काढण्याचा प्रयत्न करतो...लोकांनी या भोंदुबाबांकडे जावून त्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होऊ नये हाच हेतु.

आज त्या एस.टी मध्ये खूपच स्टिकर मला दिसली. बहुतेक काही दिवसांपूर्वीच ती नव्याने लावली गेली असावीत. आता पर्यत हे स्टिकर पाहून किती लोकं लुबाडली गेली असतील आणि किती पुढे लुबाडली जातील हे सांगता येत नाही म्हणून मोठ्या धीराने मी प्रवाश्यांच्या समोर उभा राहिलो आणि त्या स्टिकरमधील मजकूर काय आहे आपण या भोंदुबाबांकडून कसे लुबाडले जातो याविषयी माहिती सांगितली. लुबाडणुक झाल्याचे लक्षात आल्यावर स्वत: च्या अब्रु साठी पोलीसांना देखील कळवत नाही म्हणून असली स्टिकर मी अनेक वेळा शक्य होईल तसे स्वत हून काढतो असं सांगून आज मात्र हे काम तुम्ही करायला हवं असं सांगितलं कारणही तसंच होतं आज माझा वाढदिवस आहे आणि तुमच्या शुभेच्छा सोबत जर हे अंधश्रध्दा कमी करायला मदत करणारे आणि आपले सामाजिक भान जपणार काम तुम्ही केले तर मला बरं वाटेल. माझ्या वाढदिना दिवशी हे तुमच्याकडून गिफ्ट मला मिळाली असं समजेन, अशी भावनिक साद घातली आणि काय आश्चर्य पटापट सगळे प्रवासी आपाआपल्या खिडकीच्या काचेवर चिकटलेले स्टिकर काढू लागली आणि अगदी काही मिनिटांत सगळ्या काचांनी मोकळा श्वास घेतला आणि अश्या प्रकारे मला माझ्या वाढदिवसाचे कृतिशील असं गिफ्ट मिळाले..😊

या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणांसहि मी विनंती करू ईच्छितो की, आपण देखील एस.टी ने प्रवास करत असताना आपणांस अशी भोंदुगिरी वाढवणारी स्टिकर दिसल्यास काही वेळ देवून ती काढून टाकण्याच्या माझ्या मोहिमेत सहभागी व्हा...आपल्या या छोट्या - छोट्या कृती आपला समाज अंधश्रद्धा मुक्त होण्यास मदत करेल...

पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे प्रेम,शुभेच्छा,आशीर्वाद यांसाठी शतशः आभार..असाच ऋणानुबंध कायम रहावा हि सदिच्छा..सर्वांचे आभार..😊

धन्यवाद.
25/08/2017

Posted on by हर्षल जाधव | 1 comment

सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

सुनिल तुला शब्दपुष्पांजली...🙏

सुनील दोस्ता ,
तुझ असं अचानक निघून जाण मनाला प्रचंड वेदना देवून गेलय. आम्ही अस्वस्थ आहोत. तु गेल्याची बातमी ऐकली आणि मनावर प्रचंड असं दडपण मनावर आलंय. बालपणीच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. तुला आठवतय 4थी पास होऊन आपण हायस्कूल ला आलो होतो. तेंव्हा 5 वी लानवीन शाळा,
नवीन शिक्षक, नवीन मित्र-मैत्रिणी. अगदी शाळा सुरू होऊन महीनाही  न झालेला आणि आपल्याला काय काय येत हे जाणून घ्यायची शिक्षकांना दांडगी हौस निर्माण झाली होती. आपण सगळे घाबरलो होतो. आपल्या अंगात तश्या अनेक कला होत्या पण एवढ्या सगळ्या मुलांसमोर जावून बोलायचं हे धाडस काय आपल्यापैकी कोणालाच होत नव्हत..आपण सगळे गप्प होतो...पोटात भितीचा गोळा आला होता. आता पुढं जाणार कोण हाच प्रश्न होता आणि अचानक तु उठलास आणि मोठी हिम्मत करून समोर गेलास आणि छानसं अंगाई गीत म्हणालास..आम्ही सगळे त्यावेळी स्तब्धच झालो होतो...तु तेंव्हा भलतच डेरिग केलं होतस. तुझ हे धाडस बघून मग बाकीचे फटाफट जाग्यावरून उठून काहि ना काहीतरी सादर करू लागले. मला वाटतं आपलं ते स्टेजशी नातं जोड़ायचं पहिल कारण असावं.
शाळेतील सहल,क्रीडा महोत्सव यात तुझा सहभाग मोठा असायचा.अश्या वेळी सगळ्या मित्रांना एकत्र ठेवण्याची कला तुला छान जमायची. आमच्या त्यावेळच्या टीमचा तु अघोषीत कप्तानच होतास.
वार्षिक स्नेहसंमेलनाची तारीख जाहीर झाली की नाटक डान्स बसवायला आपली लगबग सुरू व्हायची. सराव करायला जागा शोधायलाच आपला बराच वेळ जायचा. तेंव्हा आता सारख्या बुडाखाली गाड्या नव्हत्या. सगळा प्रवास पायीच करावा लागायचा. पाय प्रचंड दूखायचे. सरावासाठी जागा मिळाली की मग आपला प्रवास टेपरेकॉडर व कॅसेट शोधायला सुरू व्हायचा. अनेकांचे उंबरे झिजवल्यावर मोठ्या मुश्किलीने कोणी तर टेपरेकॉडर द्यायला तयार व्हायचा. तो घेवुन मोठ्या आनंदाने आपला सराव सुरू व्हायचा. शिकवायला कोणी नसल्याने एकमेकांना समजावून घेत "असं नव्हे, असं करू" असं म्हणत नाटक डान्स बसवायचौ. ऐन स्नेहसंमेलनाच्या दिवशी आपल्या पात्राला साजेशी कपड़े शोधायला आपण गावभर फिरायचौ. अशी सगळी जमवाजमव केल्यावर स्टेजला आग लावणारा performans आपण द्यायचौ.. त्याची चर्चा पुढे अनेक दिवस व्हायची. या सगळ्या सगळ्या आठवणी आज ताज्या होत आहेत. या आठवणीच्या प्रत्येक किस्स्यात तु अजूनहि तसाच जिवंत आहेस..

तुला आठवतय 'राजकारण मोड़क्या खुर्चीचे' हे आपलं नाटक आपले मांगोरे सर बसवत होते. तु सरपंच आणि मी चेअरमन अशी पात्रे आपल्याला मिळाली होती. या नाटकाचा 23 वा प्रयोग आपल्याला मुंबईला करायचा होता त्यामुळे नाटकाची तालीम जोरात सुरू होती. यात एक प्रसंग असा होता की, चेअरमन म्हणजे मी सरपंचाला कानाखाली वाजवनार असतो पण आपल्याला काही केल्या तो प्रसंग जमत नव्हता. आपण तो प्रसंग गंभीरतेने न करता हसत करत होतो...शेवटी मांगोरे सरांना राग आला. त्यानी स्वत तो प्रसंग करून दाखवतो म्हणून उभा राहिले आणि डाइलॉग म्हणता म्हणता तुला जोरात कानाखाली वाजवली..आम्हाला वाटलं तु सांगितल्या प्रमाणे हात आडवा घेतला असशील पण घडलं भलतचं. तो सीन पूर्ण झाल्यावर तुझ्या कानाखाली पाहिलं तर खरोखरच तुला कानाखाली बसली होती...ती ईतकी जोरात लागली होती की तुझ्या गालावर चार बोटे स्पष्ट दिसत होती पण तु त्याकडे दुर्लक्ष करून तो सीन अगदी व्यवस्थित केला होतास... तो प्रसंग आठवून आपण अनेकदा हसलो होतो..अश्या आठवणींनी आपलं बालपण तु खऱ्या अर्थाने समृद्ध केलं होतस...
लहानपणी गावात मोठ्या पडद्यावर जेंव्हा पिक्चर दाखवायचे किंवा गावात एखादा ओर्केस्टा असायचा तेंव्हा आपली जागा ठरलेली असायची...आपला ग्रूप एकत्र असायचा. अनेक वेळा मी तुझ्याच मांडीवर झोपी जायचो आणि तु देखील कितीहि अवखडला तरी माझी झोपमोड़ होऊ द्यायचा नाहीस..तशी झोप उभ्या आयुष्यात मला परत कधीच लागली नाही रे...

पुढे 10 वीला असताना तुझ्यात आणि माझ्यात जोराच भांडण झालं ते भांडण एवढं टोकाच होतं की पुन्हा एकमेकांचं तोंड पहायचं नाही असंच जणू आपण ठरवलं होत. भांडणाचं कारण तसं खूपच बालिश होत. अंगातील उर्मी एकमेकांना समजून घ्यायला अडथळा ठरली आणि आजच्या एवढा समजूतदारपणा तेंव्हा नव्हता त्यामुळे एकमेकांची समजूत काढायचा मार्ग आपण वापरलाच नाही.

याचा परिणाम म्हणून पुढे अनेक वर्षे आपण बोललोचं नाही..त्यात शिक्षणासाठी आपल्या वाटा बदलल्या. शिक्षणासाठी दोघेहि गावच्या बाहेर असल्याने परत कधी एकत्र येण्याचा प्रसंगच आला नाही.
पण आता एक- दोन वर्षा मागे एका मित्राच्या लग्नात आपण भेटलो आणि ईतक्या दिवसांची द्वेषाची साखळी गळून पडून आपण एकमेकांशी अगदी दिलखुलास बोललो आणि आपल्या मैत्रीचा तो निखळ झरा पुन्हा नव्याने व्हाऊ लागला..
नंतर काही दिवसांनी मला नोकरी लागल्याची बातमी ऐकूण लगेच माझ अभिनंदन करायला तु फोन केला होतास तेंव्हा मला खुप आनंद झाला होता..

मित्रा तु आम्हाला सोडून गेला आहेस यावर आमचा अजूनहि विश्वास बसत नाही म्हणून
पुन्हा त्या शाळेच्या बाकावर तुझ्या सोबत बसायचं आहे त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये...!

एकाच ताटात जेवायची मजा पुन्हा अनुभवायची आहे त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये...!

रात्र जागवून नाटकाची तालीम पुन्हा करायची आहे त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये....!

मामाचा गरम वडा आपली वाट बघतोय
त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये....!

खालच्या गोंडाला पुन्हा एकदा तुझ्या हातच जेवण जेवायचं आहे त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये....!

गजानन महाराजांच्या पालखीला तुझ्या सोबत यंदा खांदा द्यायचा म्हणतोय.
त्यासाठी तरी फक्त एकदा परत ये...!
फक्त एकदा परत ये...!!

मित्रा,
तु शरीराने गेला आहेस,
आठवणीने नेहमी आमच्या सोबत असशील...
नेहमीच सोबत असशील..

तुझा बालपणीचा दोस्त
- हर्षल जाधव
9637351400

Posted on by हर्षल जाधव | No comments

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

कलासक्त बाबासाहेब...

#उत्तम तबलावादक #व्हायोलीनवादक #दिग्दर्शक #शिल्पकार #क्रिकेटपट्टू

बाबासाहेबांना विविध कलांची उत्तम जान होती...

ते वयाच्या बारा - तेराव्या वर्ष उत्तम तबला वाजवत..स्थानिक भजनीमंडळात आपल्या तबला वादनाची चुणुक ते वेळोवेळी दाखवत...
एकदा गल्लीतल्या भजनाच्या कार्यक्रमाला तबला वाजवणारा माणूस आला नाही त्यावेळी स्वतः डॉ.आंबेडकर यांनी खूप छान तबला वाजवला, त्यावेळी लोकांनी तोंडात बोटे घातली.

आवड म्हणुन ते व्हायोलिन सुध्दा शिकले होते...
"किंग लियर" या नाटकाचा "शहानी मुलगी" नावाने मराठी अनुवाद करुन त्याचं फ़क्कड प्रहसन त्यांनी सादर केलं होतं..
देवलांच्या "संगीत शारदा" या नाटकाचं बाबासाहेबांनी दिग्दर्शनही केलं होतं...

शेलींगकर गुरुजींकडून ते चित्रकला शिकले आणि मडिलगेकर उर्फ बापू यांच्याकडून शिल्पकलेचं मिळवलं होतं..त्यांनीच डोळे उघडे असलेले गौतम बुध्द घडवले...

स्टॉक मार्केट च्या एकुण कारभारात बाबासाहेबांना विशेष रस होता. त्यासाठी त्यानी स्वताची कंपनी देखिल सुरु केली होती कंपनीचं नाव होतं..
'स्टॉक्स अँड शेअर्स अँडव्हाझर्स'...

बाबासाहेब आंबेडकर एक उत्कृष्ट फलंदाजही होते..
बाबासाहेबांचा शालेय जीवनात मुम्बई ला आल्यावर सर्वात आवडता खेळ कोणता होता तर तो म्हणजे
"क्रिकेट" !!!
यात ते वरळी ,परळ, कोळीवाडा, सातरस्ता इ.भागातील इतर जातीच्या टीम्स ची मैच खेळत आणि स्वत: च्या टीम चे कॅप्टन असत. अनेक मैच ते जिंकत .बाबासाहेब एक चांगले फलंदाज (batsman) होते .त्यांना फलंदाजीतले बारकावे माहीत होते आणि ते आपल्या टीम मधील सहकार्याना समजावून सांगत...

असे हे हरहून्नरी बाबासाहेब...
बाबासाहेब समजायला वेळ लागतोय,
पण एकदा समजले कि त्यांच्याच विचारांचं वेड लागतय...
आणि विचारांचा घोळ होतं नाही...
अश्या या कलासक्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन...
- हर्षल जाधव, कोल्हापूर
9637351400

संदर्भ-
1) चांगदेव भवानराव खैरमोडे लिखित डॉ. भीमराव रामजी आंबेडकर खंड १ खंड 2

2) डॅा. बाबासाहेब आंबेडकर ( ' आठवणींतले बाबासाहेब ' लेखक योगीराज बागूल, ग्रंथाली प्रकाशन या पुस्तकातून. प्रकरण- मंतरलेले दिवस-न्यायमूर्ति भालचंद्र वराळे )

3) चित्रलेखा साप्ताहिक अंक 17 एप्रिल 2016..

Posted on by हर्षल जाधव | No comments

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

मुलाला मुलीसारखं वाढवण्याचं धाडस कराल काय ?

''मी माझ्या मुलीला मुलासारखं वाढवलंय" असं छाती फुगवून सांगणारे बरेच जण भेटतात. " माझी मुलगी मला मुलासारखीच आहे" असं ते जेव्हा अभिमानानं सांगतात, तेव्हा प्रश्न पडतो की, ते आपल्या मुलाला मात्र मुलीसारखं वाढवत असतील का? पण तसं होत नाही. कारण पुरूष श्रेष्ठ असतो हे आपल्या मनात खोलवर रुजलेलं आहे.
म्हणून तर मग मुलींनी एकवेळ मुलांसारखं असलेलं आपल्याला चालतं. मग ते मुलांसारखं कपडे घालणं, केस कापणं असो किंवा धाडस, कर्तबगारी दाखवणं असो.(कर्तबगार असणं आजही पुरूषीपणाचं लक्षण आहे.)
पण हेच जर मुलगा समाजाच्या व्याख्येनुसार मुलीसारखा असेल, तर त्याचा स्वीकार होतो का? म्हणजे जर मुलगा संवेदनशील असेल, त्याला स्वैयंपाक करण्यात रस असेल, तो हळवा असेल, तर पालकांना हे चालतं का? तर नाही. त्याला बायल्या म्हणून चिडवतात. त्याला मर्द बनण्याचे, कणखर वागण्याचे डोस दिले जातात.
समानता मानणारे किती पालक आपल्या मुलाला स्वयंपाकघरात घेऊन जातात, घर सांभाळणं ही दोघांची जबाबदारी असते हे शिकवतात? खरं माणूसपण हे स्त्रीचा एक माणूस म्हणून आदर करण्यात आहे, हे सांगतात? याचा आज विचार करण्याची गरज आहे.
खऱ्या अर्थाने समानता आणण्यासाठी जेवढं मुलींना कणखर आणि सक्षम बनवण्याची गरज आहे तेवढंच मुलांना संवेदनशील बनवण्याची गरज आहे.

Posted on by हर्षल जाधव | 1 comment

सोमवार, ३ एप्रिल, २०१७

समाजस्वास्थ्य’ च्या निमीत्ताने....

काल अजित दळवी लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘समाजस्वास्थ्य’ हे संततीनियमनाबद्दल बोलणाऱ्या र. धों. कर्वे यांच्या कार्याचा वेध घेणारं नाटक माझ्या कोल्हापूर टीम सोबत पाहिलं.
रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या लोकविलक्षण जीवनकार्यावर आधारीत एक उत्कृष्ट नाटक !
गिरिश कुलकर्णी यांचा सर्वांगसुंदर अभिनय- अतुल पेठे यांच सशक्त दिग्दर्शन.
आणि...पत्नी मालतीबाईंच्या भूमिकेत राजश्री सावंत-वाड मामा वरेरकर - अभय जबडे ; डॉ. आंबेडकर - अजित साबळे. अहिताग्नी राजवाडे झालेले रणजीत मोहिते आणि शेटे वकिलाच्या भूमिकेतले कृतार्थ शेगांवकरही छाप पाडून गेले.
सारेच कलाकार उत्कृष्ट, बरं का!
पण सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रधों कर्व्यांचे विचारप्रवर्तक आयुष्य!
कुटुंब नियोजन अथवा संतती नियमनाचा भारतातील आद्य प्रवर्तक - र. धों.!
स्वातंत्र्य पूर्व काळातील कर्मठ सनातनी समाज आणि या समाजाला लैंगिकता, स्त्री-पुरुष संबंध, व्यभिचार या विषयांवर लिहिणाऱ्या, बोलणाऱ्या, संततिनियमनाचा प्रसार स्वतःच्या घरापासून करणाऱ्या, त्याविषयी विविध प्रयोग करणाऱ्या रघुनाथ धोंडो कर्वे या द्रष्ट्या माणसावर अश्लिलतेचा आरोप ठेवून गुदरलेल्या तीन खटल्यांची प्रकरणं म्हणजे हे नाटक...
र.धो....१९२०-५० काळातील युगप्रवर्तक पण तात्कालीन राजकारणामुळे कुजलेल्या अनेक महानुभावांपैकी एक!
या नाटकात सनातनी - कर्मठ हिंदू समाज, स्त्रियांचे लैगिक स्वातंत्र्य, लैगिक अंधश्रद्धा यांच्यावर प्रहार करणार्‍या एक युगद्रष्ट्याची झालेली ससेहोलपट अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. नतद्रष्ट समाजाने गुणीजनांची किती आणि कशी अवहेलना केली त्याचे ज्वलंत उदाहरण...
र. धों.चे सर्व क्रांतिकारी विचार अजून समाजात रुजलेले नाहीत. पण कुटुंब नियोजन, लैंगिक शिक्षण हे शब्दही ज्या समाजात वज्र्य होते, तिथे या संकल्पना स्वीकारार्ह बनवण्यात त्यांच्या जीवनकार्याचे निश्चितच योगदान आहे हे नाटक पाहत असताना लक्षात येते.
र. धों.ची मते सर्वमान्य झाली नसतील; पण त्यावर समाजात चर्चा झाली, विचारमंथन झाले, हीही गोष्ट महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनेच ज्ञाननिर्मिती होते आणि नवे विचार मूळ धरू शकतात. शिवाय ‘समाजस्वास्थ्य’च्या त्यावेळच्या नियमित वाचकांच्या सार्वजनिक व्यवहारात नाही, तरी व्यक्तिगत जीवनात या नव्या आणि वेगळय़ा विचारांचे काही ना काही सकारात्मक प्रतििबब कसं पडत गेले हे ही या नाटकाच्या माध्यमातून कळत जाते.
आज १२५ + कोटींनंतर देशात निर्माण झालेल्या प्रचंड अराजकता आणि र.धों.नी काळाचा वेध घेऊन तेंव्हाच केलेले प्रयत्न आज नाटक पाहताना कमालीचे वाटतात..
उत्कृष्ट रंगमंच ; प्रकाश योजना ; भाषाशैली ; संवाद सातत्य यामुळे १०० वर्षा पूर्वीचा काळ प्रेक्षकांसमोर मांडण्यात सर्व टीम पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.
ज्यांना र.धों. कर्वे (महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र) यांच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांसाठी केवळ अचौक्य! (न चुकवण्यासारख) असं हे नाटक आहे.
नक्की पहा...*समाजस्वास्थ्य*
दिनांक 01/04/2017

Posted on by हर्षल जाधव | No comments